Saturday, October 8, 2016

सामान्य रुग्णांचा होमिओपॅथीवर वाढता विश्वास


केंद्र शासनाने सरकारी रुग्ण सेवा लोकाभिमुख करण्यासाठी खास आयुष मंत्रालयाची स्थापना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा एक भाग म्हणून सर्व सामान्य रुग्णांना त्यांच्या विश्वासाची आरोग्य सेवा देण्यासाठी आयुष मंत्रालयाची सेवा  विस्तारण्यात आली आहे. जवळपास सर्वच जिल्हा रुग्णालयांमध्ये आयुष सेवा केंद्र सुरू करण्यात आले असून प्रचलित वैद्यकिय सेवेसह इतरही चिकित्सा पद्धतींवर विश्वास ठेवून रुग्ण उपचार करुन घेत आहेत. 

जिल्हा रुग्णालयात असलेल्या आयुष केंद्रात आयुर्वेद, योग आणि प्राकृतिक चिकित्सा, युनानी, सिद्ध आणि होमीओपॅथी हे विभाग कार्यरत आहेत. आयुष या शब्दाची निर्मितीसुद्धा आयर्वेदा, योगा, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी यांची इंग्रजी अद्याक्षरे घेवून तयार झाली आहेत. आयुष सेवा केंद्र सन २००८ मध्ये सुरू झाले. जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात सन २००९ ला आयुष केंद्र सुरू झाले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी या सेवांचा विस्तार करीत दि. ९ नोव्हेंबर २०१४ रोजी स्वतंत्र आयुष मंत्रालय स्थापन केले. तेव्हाच इतर जिल्ह्यांमध्ये केंद्राची सेवा सुरू झाली.

आयुष केंद्राच्या स्थापनेचा उद्देश हाच आहे की, भारतात विविध चिकित्सापद्धतींचा प्राचिन अभ्यास आहे. प्रत्येक पद्धतीची काही वैशिष्ट्ये असून रुग्णांचा त्याच्यावर आजही विश्वास कायमआहे. अशा सर्व चिकित्सापद्धतींची सोग्य सेवा सामान्य रुग्णांना उपलब्ध व्हावी म्हणून आयुष केंद्रात पाचही चिकित्सापद्धतींचे तज्ञ डॉक्टर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. याशिवाय, त्या त्या पद्धतीची औषधेही उपलब्ध आहेत.

जळगाव येथे सन २००९ पासून आयुष केंद्र सुरू असल्यामुळे गेल्या ८ वर्षांत ग्रामीण भागातील बहुतांश रुग्णांचा येथील वैद्यकिय सेवांवर विश्वास कायम असून उपचार करुन घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढते आहे.

प्राचिन भारतीय पारंपरिक वैद्यकिया सेवा सामान्य लोकांपर्यंत पोहचत असल्याने या क्षेत्रातील वैद्यकिय व्यावसायिकांना सन्मानही प्राप्त झाला आहे. आयुष केंद्रात रोज सर्व प्रकारच्या तपासणीपद्धतीचे तज्ञ डॉक्टर व तंत्रज्ञ उपलब्ध असतात. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत नाही. तो आपल्या पद्धतीने व आवडीने चिकित्सापद्धतीची निवड करु शकतो.

गेल्या ४ वर्षांतील माझा अनुभव हा खुप सकारात्मक व उत्साहवर्धक आहे. मी फेब्रुवारी २०१२ पासून जळगावच्या आयुष केंद्रात होमिओपॅथीची वैद्यकिय सेवा देत आहे. पहिल्या दिवसापासून माझ्याकडे उपचाराला आलेल्या रुग्णांची संपूर्ण संकलीत माहिती उपलब्ध आहे. अगदी साध्या आजारापासून तर गुंतागुंतीच्या आजारावर रुग्ण होमिओपॅथीने उपचार करुन घेण्यास पसंती देत असल्याचे मला अनुभवाला येते. महिलांच्या, मुलांच्या अनेक आजारावर होमिओपॅथी गुणकारी सिद्ध होत आहे.

पंतप्रधान मोदींनी आयुष सेवा केद्रांचा विस्तार तालुकास्तरावरील ग्रामीण व शहरस्तरावरील कुटीर रुग्णालयांमध्येही केला आहे. त्यामुळे गावागावापर्यंत भारतीय पारंपरिक वैद्यकिय चिकित्सापद्धती पोहचणे शक्य झाले आहे. रुग्णांसाठी ही सेवा गुणकारी ठरत असल्यामुळे त्यांची संख्या दरवर्षी वाढलेली दिसत आहे. होमिओपॅथी संदर्भात रुग्णांचा प्रतिसाद व विश्वास हा आनंददायी आहे.

होमिओपॅथीवर आता सामान्य, दुर्बल व मागास घटकातील रुग्ण विश्वास व्यक्त करीत आहेत. याशिवाय मध्यम, उच्च् व उच्चभ्रू घटकातील रुग्णांची संख्याही लक्षणिय वाढली आहे. ही बाब आयुष केंद्रासाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरते आहे. सर्वच घटकातील रुग्णांत पाईल्स, मूळव्याध, पांढरे डाग, मूखखडा, त्वचा, केसगळती-पांढरे होणे, अस्थमा आदी अनेक आजारांचे रुग्ण वाढताना दिसत असून त्यांना होमिओपॅथीच्या उपचाराने गुण सिद्ध होत आहे. खास करुन महिला, मुलांच्या आजारावरही होमिओपॅथी हमखास उपचारासाठी उपयुक्त ठरते आहे. सर्व प्रकारचे लिंग, वय, समाज घटकातील रुग्ण होमिओपॅथीच्या उपचारासाठी उत्सूक दिसत असून उपचाराने प्रकृतीला गुण आल्यानंतर त्याचा मौखिक प्रचार होवून रुग्ण संख्या वाढत आहे. आयुष केंद्रातील एक वैद्यकिय अधिकारी म्हणून मला या उपचार पद्धतीविषयी नक्कीच अभिमान आहे.
.

No comments:

Post a Comment